बीड: बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदीपात्रात एक थरारक बोट अपघात झाला आहे. सुदैवाने, बोट काठाजवळच उलटल्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली असली, तरी ४ ते ५ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बोट चालकाने ५० पेक्षा अधिक लोकांना बळजबरीने बोटीत बसवले होते.

जास्त लोकांना बळजबरीने बोटीत बसवल्यानंतर प्रवाशांनी लोक कमी बसवण्याची विनंती करूनही चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बोट उलटताच सर्वजण पाण्यात बुडाले, मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले.

आता संतप्त प्रवाशांनी या चालकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली असून, अशा बोटींमधील प्रवाशांची संख्या १० च्या आत असावी, असा आग्रह धरला आहे. याच ठिकाणी यापूर्वीही एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस सुधारणा झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.







