मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अखेर यशस्वी झाल्याचे चित्र समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा खासदारांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या खासदारांचा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)

शिंदे गटाच्या वाटेवर गेलेल्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना लोकसभेत मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण ऑपरेशनची तयारी काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. एनडीएच्या एका महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संमती आवश्यक होती. अमित शाह यांनी मोदींशी चर्चा केल्यानंतर या राजकीय हालचालींना हिरवा कंदील मिळाल्याचे सांगितले जाते.
यानंतर अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये पुढील रणनीती, कायदेशीर प्रक्रिया आणि खासदारांच्या संमतीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, ठाकरे गटानेही खासदारांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. काही खासदारांनी पक्ष सोडणार नसल्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. मात्र, पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय संपर्कांमुळे परिस्थिती बदलत गेली.
मंगळवार रात्रीपासून संबंधित खासदार टप्प्याटप्प्याने दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून शिवसेनेतील राजकीय संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.







