लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू असतानाच, कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीत भीषण वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांचे अपुरे नियोजन आणि अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, तासनतास अडकून पडल्याने वाहनचालक आणि प्रवासी पुरते मेटाकुटीला आले आहेत.

तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरून देहूच्या दिशेने परतीच्या प्रवासावर असताना, सोलापूर रस्त्यावरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली. बुधवारी (ता. 05) कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे मुक्कामी होती. आज गुरुवारी (ता. 06) पुण्याच्या दिशेने निघाली त्यामुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.

अनेक बस, जड वाहने, रुग्णवाहिका आणि दुचाकीस्वार या कोंडीत तासनतास अडकून पडले. पडणारा रिमझिम पाउस आणि वाहतूक कोंडीमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि भाविकांचे हाल झाले.

पालखीच्या परतीच्या प्रवासाची पूर्वकल्पना असतानाही प्रशासनाने योग्य पर्यायी मार्गांचे नियोजन केले नव्हते का? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून विचारला जात आहे. महामार्गावरील मुख्य चौकात आणि सेवा रस्त्यांवर अचानक वाहने समोरासमोर आल्याने कोंडीत अधिकच भर पडली. काही ठिकाणी वाहतूक पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु वाहनांची संख्या प्रचंड असल्याने आणि काही बेजबाबदार वाहनधारकांनी लेन तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली.
“आम्ही गेल्या दीड ते दोन तासांपासून एकाच ठिकाणी अडकून पडलो आहोत. पालखीचा मार्ग माहीत असताना प्रशासनाने योग्य त्या वेळी वाहतूक डायव्हर्ट करायला हवी होती. महामार्गावर दरवर्षी पालखीच्या वेळी अशीच परिस्थिती निर्माण होते, तरीही प्रशासनाला कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही.”
विवेक शिंदे, प्रवासी, पुणे







