पुणे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरुर बायपास परिसरात होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या भागात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विविध सुरक्षात्मक उपाययोजना अंमलात आणल्या जात असून, यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

रस्त्याची सुरक्षा आणि इतर प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी 25 तारखेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत शिरुर तहसीलदार कार्यालयात तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एस. एस. लाड, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अशोक सोडगीर, तसेच प्रकाश मुसळे, अरुण घावटे, संजय शिंदे, बाबाजी वर्पे आणि विठ्ठल घावटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
पहिला टप्पा: पाषाणमळा ते विघ्नहर्ता हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तातडीने ७.५ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड तयार केले जातील.
दुसरा टप्पा: विघ्नहर्ता हॉस्पिटल ते सतरा कमानी पुलापर्यंत उपलब्ध जागेनुसार दोन्ही बाजूंना ७.५ मीटर रुंदीचे रस्ते बनवले जातील.
स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि इतर वाहनांच्या सततच्या गर्दीमुळे या महामार्गावर अपघाताचा धोका कायम असायचा. नवीन सर्व्हिस रोडमुळे महामार्गावरील सुसाट वाहतूक आणि स्थानिक वाहनांची वर्दळ पूर्णपणे वेगळी होईल. यामुळे वाहतूक कोंडी सुटून अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास संजय पाचंगे यांनी व्यक्त केला. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे उपोषणाचा मार्ग टळला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.






