उरुळी कांचन, (पुणे) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात सध्या सुरू असलेल्या प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गावागावांतून राष्ट्रवादीला भक्कम पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी व्यक्त केला.

उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गट व हवेली पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मारुती मंदिरात करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष कोरेकर बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, यशवंत सहकारी कारखान्याचे संचालक संतोष कांचन, सुनील कांचन, बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली महाडिक, माजी उपसभापती हेमलता बडेकर, सरपंच मिलिंद जगताप, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, भाऊसाहेब कांचन, मयूर कांचन, माजी उपसरपंच संचिता कांचन, भाऊसाहेब तुपे, शिंदवणेचे माजी सरपंच गणेश महाडिक, उद्योजक सागर कांचन, शहराध्यक्ष रामभाऊ तुपे, ओबीसी नेते धनंजय दिक्षित, सुभाष बगाडे, आप्पा बगाडे, दिलीप गाडेकर, स्वराज तुपे, आदि परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातून जितेंद्र बडेकर, सोरतापवाडी गणातून आण्णा महाडिक तर उरुळी कांचन पंचायत समिती गणातून कोमल गणेश कांबळे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. स्वच्छ चारित्र्य, प्रामाणिक नेतृत्व, आणि तळागाळातील नागरिकांशी असलेला थेट संपर्क हीच या उमेदवारांची खरी ताकद असून त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे, असेही कोरेकर म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन म्हणाले, “प्रचारादरम्यान उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. विकासकामांचा लेखाजोखा मांडत पुढील काळातील आराखडा मतदारांसमोर ठेवण्यात येत आहे. “राजकारण केवळ सत्तेसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असावे,” हा संदेश देत राष्ट्रवादीचे उमेदवार जनतेशी जोडले आहेत. उरुळी कांचन गटातील तिन्ही उमेदवार हे अनुभवी, अभ्यासू व जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे असल्याचे सांगितले. “जनतेच्या विश्वासावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. हा विश्वासच आम्हाला मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देईल,” असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांत उरुळी कांचन परिसरात विकासकामे केली आहेत. पाणीपुरवठा योजना, अंतर्गत रस्त्यांची कामे, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सोयी, महिला व युवकांसाठी विविध उपक्रम यामुळे पक्षाबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांसाठी राष्ट्रवादीने सातत्याने काम केल्यामुळे मतदारांचा कौल पक्षाच्या बाजूने लागेल.
दरम्यान, एकूणच उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण अनुकूल असून, येत्या निवडणुकीत तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास विविध पदाधिकाऱ्यांनी केला आहे.







