उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन हद्दीत रिक्षातून उजव्या बाजूने उतरलेल्या इसमाचा टेम्पोखाली जाऊन चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. उरुळी कांचन हद्दीतील तळवडी चौक परिसरातील मंगळवारी (ता. 01) सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सदर अपघातात मयत झालेला तरुण परप्रांतीय असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा तरुण हा हडपसर बाजूकडून सोलापूरच्या दिशेने रिक्षातून निघाला होता. उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरल्याने त्याचा तोल गेला व तरुण महामार्गावर पडला. यावेळी सोलापूर बाजूकडे निघालेल्या टेम्पोखाली चिरडला गेला. सदर व्यक्तीचा अपघात मृत्यू झाला त्या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहे. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असूनही उरुळी कांचन पोलिस रिक्षाचालक व टेम्पोचालक या दोघांकडे चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये रिक्षा भर महामार्गावर थांबलेली असल्याचे दिसत असल्याची माहिती आहे. तसेच प्रवासी रिक्षाच्या उजव्या बाजूने खाली उतरत असल्याचेही दिसून येत आहे. प्रवासी उतरविण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे न घेता महामार्गावरच थांबविले जात असेल, तर अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी जाणार? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

“मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन”
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. सदर इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास किंवा त्याच्याबाबत कोणाला माहिती असल्यास तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब मत्रे करीत आहेत.






