नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महिला आरक्षण, पेपरफुटी, कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध आहे, असे कोण सांगत आहे, असा सवाल त्यांनी केला. 2023 मध्ये काँग्रेसने महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती विधेयक आणले होते. त्यामुळे महिला आरक्षणाची सुरुवात करणारे आम्हीच आहोत, असा दावा चव्हाण यांनी केला.

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही प्रश्न उपस्थित केला. आरएसएस एखाद्या महिलेला संघचालकाचे पद देणार का, असा सवाल त्यांनी केला.

राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरतीतील पेपरफुटीच्या घटनांवरही चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. वारंवार पेपर फुटत आहेत आणि या प्रकरणांमध्ये सत्ताधारी पक्षातील मोठ्या नेत्यांची नावे समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला. पेपर कोट्यवधी रुपयांना विकले जात असल्याचे सांगत या प्रकाराची गंभीर दखल घेऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, काँग्रेसच्या 10 दिवसांच्या शिबिराच्या समारोपासाठी राहुल गांधी नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत कुंभमेळा, शक्तिपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप होत असून, या विषयावर केंद्र सरकारसमोर आवाज उठवण्याची भूमिका राहुल गांधी यांनी मांडल्याची माहिती दिली. शक्तिपीठ महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात कमिशन घेतले जात असल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला.
राज्यातील खराब रस्ते आणि खड्ड्यांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल अद्याप स्पष्ट नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता काही ठराविक लोकांना कंत्राटे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिबिरात सहभागी होऊन राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.






