उरुळी कांचन, (पुणे) : राज्य शासनाने रुग्णांच्या सुविधेसाठी मंजूर केलेल्या उरुळी कांचन ते प्रयागधाम दरम्यानच्या 9 कोटी रुपयांच्या भव्य डांबरी रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीरपणे माती अन् दगडांचे ढिगारे टाकून रस्ता बंद केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी (ता. 28) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंधारात हा बेकायदेशीर ढिगारा न दिसल्याने एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. ढिगाऱ्याला धडकून दुचाकीस्वार तब्बल 10 ते 15 फूट हवेत उडून खाली फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला आहे.

आप्पा विजय पौळ (रा. झोंबाडे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे या अपघातात गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर उरुळी कांचन येथील रुग्णालयात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आप्पा पौळ हे गुरुवारी रात्री कोरेगाव मूळ येथीळ काम उरकून आपल्या दुचाकीवरून राहत्या घरी उरुळी कांचनकडे निघाले होते. सदरचा सार्वजनिक डांबरी रस्ता अज्ञात लोकांनी माती व दगड टाकून बेकायदेशीरपणे बंद केला आहे, याची कोणतीही पूर्वकल्पना पौळ यांना नव्हती.

रात्री साडेदहाच्या सुमारास रस्त्यावर 3 ते 4 फूट उंच केलेला मातीचा ढिगारा अचानक समोर आल्याने दुचाकीचा वेग नियंत्रित झाला नाही. त्यामुळे दुचाकीला धडक बसली. धडक इतकी भीषण होती की आप्पा पौळ हे दुचाकीवरून तब्बल 10 ते 15 फूट हवेत उडून दूर फेकले गेले. या अपघातात त्यांच्या शरीराला गंभीर दुखापती झाल्या असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातून प्रयागधाम येथील रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची हाल सोसण्याची अडचण ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या रस्त्याचे बांधकाम पीएमआरडीएच्या वतीने करण्यात आले आहे.
मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून काही अज्ञात नागरिकांनी या सार्वजनिक रस्त्यावर दगड, मुरुम आणि माती टाकून तब्बल 3 ते 4 फूट उंच भिंतीसारखा ढिगारा तयार केला आहे. यामुळे संपूर्ण वाहतूक बंद पडली असून रुग्णालयात जाणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांना व नागरिकांना मोठा वळसा घालून जावा लागत आहे.
पीएमआरडीए प्रशासनावर उठले प्रश्नचिन्ह..
शासनाचा 9 कोटींचा निधी खर्च करून उभारलेला रस्ता दोन-तीन महिने बंद असताना पीएमआरडीए अधिकारी झोपले होते का? असा संतप्त सवाल उरुळी कांचनकर विचारत आहेत. एखाद्या निरपराध नागरिकाचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? रस्त्यावरील बेकायदेशीर माती-दगडांचे ढिगारे तात्काळ हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा. अपघातात गंभीर जखमी झालेल्या आप्पा पौळ यांना नुकसानभरपाई देऊन पीएमआरडीएने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.






