यवत (पुणे) : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात यवत (ता. दौंड) येथे ओबीसी समाज आक्रमक झाला. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली यवत चौकात शासन निर्णयाची होळी करून जोरदार निषेध नोंदविण्यात आला. आंदोलकांच्या मोठ्या गर्दीमुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी पाटस टोल नाका ते मुंबई महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने यवत चौकात जमले होते.

आंदोलकांनी शासन निर्णयाची होळी करत ‘आरक्षण वाचवा, ओबीसी वाचवा’, ‘ओबीसींच्या हक्कावर गदा सहन केली जाणार नाही’, ‘आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी मैदानात’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शासनाने संबंधित निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

‘संविधान मानायचे की गॅझेट?’
यावेळी प्रा. लक्ष्मण हाके यांनी शासनावर जोरदार टीका केली. “जीआरला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्याचे औचित्य साधून शासन निर्णयाची होळी करण्यात आली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मानायचे की हैदराबादचे गॅझेट मानायचे, याचा विचार केला पाहिजे,” असे हाके म्हणाले.
लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांकडून कुणबी दाखले घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी त्यांच्या मुलांना व नातेवाईकांना कुणबीचे दाखले काढून घेतले आहेत. त्यामुळे मागासवर्गीय ओबीसींच्या संधी हिरावल्या जात आहेत,” असा दावा हाके यांनी केला.
महामार्गावर वाहनांच्या रांगा
आंदोलनामुळे यवत चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांची गर्दी आणि घोषणाबाजीमुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शासनाच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आरक्षणाचा संघर्ष पुन्हा एकदा रस्त्यावर आला असून, यवतच्या आंदोलनाने या संघर्षाची तीव्रता अधोरेखित केली आहे.






