Sugarcane Price Issue : पुणे : उसाचा रास्त व किफायतशीर दर आणि साखरेची किमान विक्री किंमत यामध्ये मोठा फरक असल्याने साखर उद्योगाला (Sugar factories) आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिली.

पवार म्हणाले की, साखरेचा विक्री दर वाढविण्याची गरज असून उद्योगासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. याबाबत राज्यातील मंत्री तसेच राष्ट्रीय आणि राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारशी चर्चा केली जाईल. शेतकरी आणि कारखान्यांच्या हिताचा निर्णय होईल याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
ऊस गाळप आणि साखर विक्रीची सद्यस्थिती यावर हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका मांडली. सध्या कारखान्यांना साखरेचा किरकोळ विक्री दर सुमारे 3875 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. हा दर किमान 4100 रुपये प्रति क्विंटल करावा, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. गाळप हंगाम सुरू असून लवकर निर्णय झाल्यास साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतल्याची माहिती देण्यात आली. अनेक शेतकरी केळीऐवजी ऊस पिकाकडे वळत असून उसाचे उत्पादन वाढत आहे. मात्र दुसरीकडे साखरेचा वापर कमी होत चालल्याचे चित्र आहे. साखरमुक्त शीतपेयांची मागणी वाढत असून काही देशांमध्ये साखर आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे साखर उद्योगापुढे नवी आव्हाने उभी राहिली असल्याची चिंता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.







