रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या चार लहान मुलांना थंडपेयातून विष पाजल्यानंतर स्वतःही विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आईसह तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला असून दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत महिलेचे नाव आशा जाधव (वय 29) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा जाधव यांनी आपल्या चार मुलांना थंडपेयातून विष दिल्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. या घटनेत आशा जाधव, त्यांची मुलगी नंदिनी जाधव (वय 7) आणि दुर्वा जाधव (वय 6) यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेतील दोन मुलांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी किंवा अन्य काही कारण या घटनेमागे आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणाची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खरवली आदिवासी वाडीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






