पुणे : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या मागणीनुसार जमीन संपादनासाठी संमतीपत्रे व मोबदला स्वीकारण्याची अंतिम मुदत आता 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधून एकूण 1216 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी आतापर्यंत 851 हेक्टर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी संमतीपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे प्रशासनाकडे जमा केली आहेत. सुमारे 70 टक्के जमिनींचे करारनामे पूर्ण झाल्याने त्या क्षेत्राचे संपादन झाल्याचे मानले जात आहे.

विमानतळासाठी वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, खानवडी आणि मुंजवडी या सात गावांतील सुमारे 1216 हेक्टर म्हणजेच जवळपास 3 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. 7 मेपासून शेतकऱ्यांनी संमतीपत्रे देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 735 हेक्टर क्षेत्रासाठी संमती मिळाली आहे.
दरम्यान, अनेक जमिनींचे मूल्यांकन, न्यायालयीन दावे, वारस नोंदी, नाव दुरुस्ती, हक्कसोडपत्रे आणि इतर महसुली प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत शेतकऱ्यांना सुमारे 900 कोटी रुपये मोबदल्यापोटी वितरित केले आहेत. तसेच जमिनींच्या सर्च रिपोर्टची प्रक्रिया जलद करण्यासाठी पाच वकिलांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू असून 30 जूनपर्यंत अधिकाधिक शेतकऱ्यांनी संमतीपत्रे सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







