दिल्ली: गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ पेक्षा जास्त पेपर लीक झाल्यामुळे सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी होऊनही एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. प्रामाणिक विद्यार्थी वर्षानुवर्षे ८ ते १० तास अभ्यास करत असताना, ४० ते ५० लाख रुपये मोजणाऱ्यांना मागच्या दाराने संधी मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना “अपयशी शिक्षणमंत्री” म्हटले. त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

विद्यार्थी दहशतवादी नाहीत, तरी त्यांच्यावर पेलेट गनचा वापर करण्यात आला, असा आरोप करत राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला.
देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, भारत सरकारचे शिक्षण बजेट १.४ लाख कोटी रुपये आहे, तर भारतीय कुटुंबे केवळ नीट (NEET) परीक्षेसाठीच सुमारे १.३२ लाख कोटी रुपये खर्च करतात. नीट परीक्षेवरील खर्च हा देशाच्या शिक्षण बजेटच्या जवळपास असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्याची शिक्षण व्यवस्था मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी परवडणारी राहिलेली नाही, असा आरोप करत त्यांनी विद्यार्थी आणि पालकांवर आर्थिक भार वाढत असल्याचे सांगितले. शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तरुणांसमोर रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
चिनी वस्तूंच्या वाढत्या आयातीमुळे आणि लघुउद्योगांपुढील अडचणींमुळे उत्पादन क्षेत्रातील रोजगार कमी होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच, बँकांचे कर्ज आणि आर्थिक पाठबळ केवळ मोजक्या मोठ्या उद्योगपतींनाच मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळेही अनेक क्षेत्रांतील नोकऱ्यांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.






