छत्रपती संभाजीनगर: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दुशिंगपूर परिसरात मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी वाहनांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना घडली. रस्त्यावर धारदार लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर करायचे आणि त्यानंतर प्रवाशांना लुटायचे, अशी पद्धत वापरल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी मध्यरात्री महामार्गावर काही ठिकाणी जाणीवपूर्वक लोखंडी वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या 2 ते 3 वाहनांचे टायर पंक्चर झाले. यातील एका कारमधून छत्रपती संभाजीनगर येथील कुटुंब प्रवास करत होते.

कारचे टायर अचानक पंक्चर झाल्यानंतर चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. गाडी थांबताच जवळच्या झुडपांमध्ये लपून बसलेल्या दरोडेखोरांनी बाहेर येत कुटुंबाला धमकावले. शस्त्रांचा धाक दाखवून त्यांनी प्रवाशांकडील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू जबरदस्तीने घेतल्या.

या घटनेत कुटुंबाचे सुमारे 18 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरोडेखोरांनी एकाच ठिकाणी अनेक वाहनांचे टायर पंक्चर केल्याने या भागातून जाणाऱ्या इतर प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पीडित कुटुंबाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी नाशिक ग्रामीणमधील वावी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







