बीड: परभणीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मेळाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झालेल्या संजय जाधव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

परभणीच्या जिल्हा क्रीडा संकुलावर होणाऱ्या या मेळाव्यात ठाकरे गटातील विविध नगरपरिषद, महापालिकांमधील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच अन्य पदाधिकारी आणि नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, शहरात मोठ्या प्रमाणावर भगवे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत.

मात्र, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासह हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना परभणीत हा कार्यक्रम घेऊ नये, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करताना जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावरही जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या नावाखाली मराठा समाजाच्या भावनांशी खेळल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संजय शिरसाट आणि संजय जाधव यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप करत कार्यक्रम घेऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.
जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रतिक्रिया दिली. शिंदे यांनी दिलेले आव्हान आपण स्वीकारत असून, त्याची परतफेड मुंबईत करू, असा इशारा त्यांनी दिला. आपल्या पुढील आंदोलनाची तारीख १२ सप्टेंबरला जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जरांगे यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर परभणीतील वातावरण अधिक संवेदनशील झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. परभणीचे पोलीस अधीक्षक खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी पोहोचले असून, शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरळीत पार पाडणे आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवणे, यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
एकीकडे शिंदे गटाकडून कार्यक्रम नियोजित वेळेनुसार घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे, तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतल्याने परभणीतील राजकीय आणि सामाजिक वातावरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







