शिरूर : शिरूर तालुक्यातील चांडोह येथील जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीने परस्पर कुलूप ठोकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी(ता.३१)सकाळी उघडकीस आला.शाळेच्या प्रवेशद्वारालाच कुलूप असल्याने शाळेत दाखल झालेल्या तब्बल ९१ विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांऐवजी भर उन्हात रस्त्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली.या संतापजनक प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चांडोह येथील जिल्हा परिषद शाळेत परिसरातील ९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.नेहमीप्रमाणे सोमवारी(ता.३१)सकाळी विद्यार्थी शाळेत दाखल झाले.मात्र, शाळेच्या गेटला अज्ञात व्यक्तीने कुलूप लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशच करता आला नाही.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी नाईलाजाने रस्त्यावरच वर्ग भरविला.भर उन्हात रस्त्यावर बसून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र पाहून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली.

शाळेला कुलूप ठोकण्याचा अधिकार दिला कोणी?
शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सार्वजनिक जागा असताना परस्पर शाळेला कुलूप लावण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला कोणी दिला? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेचे नियमित कामकाज बंद पाडण्याचा हा प्रकार गंभीर असून, यामागे नेमके कोण आहे.याचा प्रशासनाने तातडीने छडा लावावा, अशी मागणी होत आहे.शांताराम पानमंद व दादाभाऊ पानमंद यांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार?
शाळेला कुलूप लावण्यामागील नेमके कारण काय? हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला का? शाळेचे कामकाज विस्कळीत करण्याचा यामागे कोणाचा हेतू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने शोधणे गरजेचे आहे.
९१ विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांऐवजी रस्त्यावर बसून शिक्षण घ्यावे लागणे ही केवळ एका शाळेची समस्या नसून शिक्षण व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शैक्षणिक हक्कांचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही प्रशासनाने केवळ पाहत बसणे योग्य नाही.
या घटनेची तातडीने चौकशी करून अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा.संबंधितावर गुन्हा दाखल करावा आणि भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात,अशी मागणी संतप्त पालकांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या शाळेलाच कुलूप ठोकले जात असेल,तर जबाबदार कोण? हा सवाल आता चांडोह ग्रामस्थ आणि पालक प्रशासनाला विचारत आहेत.







