पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या वादाला आता मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे. खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, पाणी आणि विजेची समस्या तसेच वाढती वाहतूक कोंडी यामुळे त्रस्त झालेल्या सुमारे २० लघुउद्योगांनी साताऱ्यातील खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने या प्रश्नाची गंभीर दखल घेतली आहे.

उद्योगांच्या अडचणींबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली. उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही देण्यात आली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाकणच्या विकासासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

चाकणचा विकास अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी चाकण महानगरपालिका स्थापन करावी किंवा स्वतंत्र इंडस्ट्रियल टाऊनशिप तयार करावी, याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रस्तावित आराखड्यात चाकणसोबत राजगुरूनगर, आळंदी आणि आसपासच्या सुमारे ५० गावांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिका किंवा इंडस्ट्रियल टाऊनशिप झाल्यास रस्ते, पाणी, वीज, वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवता येतील, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. यामुळे उद्योगांचे स्थलांतर थांबण्यास मदत होईल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही कायम राहतील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मात्र, यापूर्वीही चाकणच्या विकासाबाबत अनेक घोषणा झाल्याने स्थानिक नागरिक सध्या सावध भूमिका घेत आहेत. प्रत्यक्ष निर्णय आणि त्याची अंमलबजावणी होईपर्यंत केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही उद्योगांनी आधीच स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारकडून लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची मागणी होत आहे. चाकणच्या उद्योगांना आवश्यक सुविधा देऊन उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यास शासन प्राधान्य देत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.






