मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालावरही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्य परीक्षेतील काही विद्यार्थ्यांना अत्यंत कमी गुण मिळाल्याने परीक्षा तपासणीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काही विद्यार्थ्यांना 250 पैकी अवघे 2, 6, 11 किंवा 14 गुण मिळाले आहेत. त्यामुळे गुणांकन प्रक्रियेत पारदर्शकता होती का, असा सवाल विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने यंदा पहिल्यांदाच राज्यसेवा मुख्य परीक्षेची लेखी परीक्षा घेतली. त्यानंतर परीक्षेचे गुणही जाहीर करण्यात आले. मात्र, गुण समोर आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, काहींच्या निबंध आणि सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये गुणांमध्ये मोठी तफावत आहे. काही विद्यार्थ्यांना निबंधात 150 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तर काहींना अत्यंत कमी गुण मिळाले आहेत. वैकल्पिक विषयांच्या दोन पेपरमध्येही मोठा फरक असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, एका विद्यार्थ्याला भूगोलाच्या एका पेपरमध्ये 250 पैकी 121 गुण मिळाले, तर दुसऱ्या पेपरमध्ये केवळ 2 गुण मिळाले. तसाच प्रकार तत्त्वज्ञानाच्या पेपरमध्येही दिसून आल्याचा दावा केला जात आहे. एका विद्यार्थ्याला एका पेपरमध्ये फक्त 6 गुण मिळाले आहेत. समाजशास्त्राच्या पेपरमध्येही काही विद्यार्थ्यांना 11 आणि 6 गुण मिळाल्याचे समोर आले आहे.
याशिवाय, काही विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये चांगले गुण मिळूनही मराठी किंवा इंग्रजी या पात्रता विषयांमध्ये आवश्यक गुण मिळाले नाहीत. त्यामुळे काही उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरू शकले नाहीत.
औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणामुळे आधीच आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. त्यात आता राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या गुणांबाबतच्या तक्रारींमुळे विद्यार्थ्यांच्या नाराजीत आणखी भर पडली आहे. या गुणांबाबत आयोगाने स्पष्टता द्यावी आणि तपासणी प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी होत आहे.






