माळशिरस, ता. 29 : गुन्ह्यात अटक न करण्यासह तपासात मदत करण्याच्या नावाखाली पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे तब्बल 25 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. माळशिरस-पिलीव रोडवरील पुलाखाली 5 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन खासगी व्यक्तींना एसीबीने रंगेहाथ पकडले.

आबा सावळा वळकुंदे (वय 48, रा. वळकुंदे मळा, माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय 39, रा. मोटेवाडी, माळशिरस) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात पोलीस हवालदार अनिल महादेव शिंदे आणि पोलीस हवालदार राहुल मारुती वाघ यांचीही नावे तक्रारीत समोर आली आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 21 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल झाली होती. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर अटकपूर्व जामीन मिळवून देणे तसेच काही कायद्याची कलमे न लावण्याच्या बदल्यात पुन्हा लाचेची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

24 ऑगस्ट रोजी केलेल्या पडताळणीत आबा वळकुंदे याने तक्रारदाराकडे पोलिस अधिकारी व डीवायएसपी यांच्या नावाने 25 लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 27 ऑगस्टच्या पडताळणीत तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देण्यासाठी 5 लाख रुपये डीवायएसपींसाठी आणि 50 हजार रुपये पोलिस हवालदारासाठी, अशी एकूण 5 लाख 50 हजार रुपयांची मागणी झाल्याचे समोर आले.
त्यानुसार 28 ऑगस्ट रोजी माळशिरस-पिलीव रोडवरील पुलाखाली एसीबीने सापळा रचला. यावेळी 5 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आबा वळकुंदे आणि महादेव माने यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.






