पुणे: यंदाच्या मान्सून हंगामावर एल निनोचा परिणाम जाणवत असून देशासह महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पुणे वेधशाळेतील हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मान्सून हंगामात सरासरीच्या सुमारे 90 टक्के पर्जन्यमान होण्याचा अंदाज आहे. (Pune Weather)

सध्या मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक वातावरणीय परिस्थिती पूर्णपणे अनुकूल नसल्याने त्याच्या प्रगतीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उर्वरित भागात मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. राज्यात पुढील काही दिवस व्यापक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वमोसमी पावसाच्या काही सरी राज्यातील विविध भागांत झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी त्यावर विसंबून घाईघाईने पेरणी करू नये, असा महत्त्वाचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. पावसात खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पेरणीचे निर्णय काळजीपूर्वक घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.
एल निनोमुळे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेती, जलसाठे आणि पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पाऊस कमी झाल्यास धरणांतील पाणीसाठा घटण्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची तसेच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
2002, 2009 आणि 2015 या वर्षांत एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम झाल्याची नोंद आहे. त्या काळात अनेक भागांमध्ये कमी पाऊस पडून शेतीला मोठा फटका बसला होता. मात्र प्रत्येक एल निनो वर्ष दुष्काळीच ठरते असे नाही, असे हवामान तज्ज्ञ सांगतात.
हवामान अभ्यासकांच्या मते, एल निनोमुळे पावसाचे वितरण असमान होऊ शकते. काही भागांत पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. दुसरीकडे काही भागांना अल्प कालावधीत अतिवृष्टीचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आगामी काही दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असून शेतकरी आणि संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.







