यवत(पुणे): राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी यशदा येथे आयोजित कार्यक्रमास भेट दिली. भारतीय संविधानातील 73 व्या घटना दुरुस्तीचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येत असून या घटना दुरुस्तीमुळे ग्रामविकासाला नवी दिशा व ग्रामीण विकासाला चालना मिळाली असल्याचे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
यावेळी प्रथम स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मंत्री जयकुमार गोरे यांनी आदरांजली वाहिली. येत्या 26 व 27 एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या तयारीची पाहणी केली. तसेच राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, यशदा ही देशाला दिशा देणारी संस्था आहे. या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले अधिकारी सर्वोच्च पदावर काम करत आहेत. शासन विविध योजनांद्वारे ग्रामविकासाला चालना देत असून ग्रामविकास विभागाकडून समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेची संकल्पपूर्ती अंतिम टप्प्यात आहे.
यावेळी यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, उपमहासंचालक पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राज्य ग्रामीण विकास संस्थेचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पंचायत राज संचालक गिरीश भालेराव उपस्थित होते.