लातूर : खरीप पाठोपाठ रब्बी हंगामतील पिकांच्या दरातून शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. भाजीपाला आणि इतर पिकांतून उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. अशातच चिंच या फळपिकाचाही शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. चिंचेचे सरासरीएवढे उत्पादन असले तरी प्रतिक्विंटल ११ हजार रुपये दर मिळत असल्याने आंबट चिंच शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने गोड ठरत आहे.
जिल्ह्यात आंबा वगळता फळपिकाचे क्षेत्र नाममात्र आहे. क्षेत्र कमी असले तरी आंबा आणि चिंचामधून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चिंचेतून गोड आणि आंबट लगदा मिळतो. जो खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. सध्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिंचेची आवक सुरु झाली आहे. इतर शेतीमालाच्या दराच्या तुलनेत चिंचेचे दर लक्षवेधी ठरत आहेत. हरभरा, तूर, उडीद, करडई, सोयाबीन या मुख्य शेतीमालाच्या दरात कमालीची घट होत आहे. त्यामुळे शेतीमालाच्या विक्रीपेक्षा साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर आहे.
चिंचेची आवक दिवसाकाठी ३५० क्विंटल असून सरासरी ११ हजार रुपये दर मिळत आहे. जे मुख्य पिकांतून साध्य झाले नाही ते कमी क्षेत्रावर असलेल्या फळपिकांमधून शेतकऱ्यांना मिळत आहे. जिल्ह्यात निलंगा, देवणी, लातूर या जिल्ह्यांमध्ये चिंचेचे क्षेत्र अधिक आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने उत्पादन वाढ तर झालीच आहे, पण दुसरीकडे मागणीही वाढल्याने दर गगणाला भिडले आहेत.
चिंचोक्याचेही पैसे
आंबट-गोड चिंचेला चांगला दर तर मिळतच आहे. चिंचोक्याचेही पैसे होत आहेत, चिंचोक्याला प्रतिक्विंटल ३ हजार ४०० रुपये दर मिळत आहे. येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२० क्विटल चिंचोक्याची आवक होत आहे.