यवत(पुणे): बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख व यवत येथील विश्वजीत उर्फ अविनाश चव्हाण यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ यवत येथील नागरिकांनी भव्य मोर्चा काढत यवत ग्रामपंचायतच्या वतीने पोलिसांना निवेदन दिले.
मस्साजोग (जि. बीड) चे सरपंच संतोष देशमुख व दि. 5 रोजी यवत येथील विश्वजीत उर्फ अविनाश चव्हाण यांच्या हत्येच्या निषेधार्थ यवत बंदचे आवाहन करून भव्य मोर्चा काढण्यात आला. श्री काळभैरवनाथ मंदिरापासून यवत पोलीस स्टेशन असा मोर्चा काढत संतोष देशमुख व अविनाश चव्हाण यांच्या हत्येचा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, सखोल चौकशी करून इतर दोषी आढळल्यास त्यांना या खटल्यात सहआरोपी करावे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या. मोर्चात अविनाश यांच्या पत्नी व तीन वर्षाचा मुलगा हे देखील सहभागी झाले होते. यांना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली असून गुन्ह्यातील आरोपींवर फास्टट्रॅक कोर्टात केस चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यवत ग्रामस्थांनी केली. तर यवत येथील चव्हाण कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तरूण विश्वजीत चव्हाण यांचा मृत्यू झाला असून कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपींचा सखोल तपास करून हा खटला देखील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. अशी मागणी यवत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
१२ तासात यवत पोलिसांनी तत्परतेने आरोपींना अटक केली असून याबद्दल पोलिसांचे आभार व्यक्त केले परंतु गुन्ह्याच्या बाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे जर आरोपी चोरीच्या उद्देशाने आले असतील तर मग चोरी का केली नाही? असा सवाल उपसरपंच सुभाष यादव यांनी उपस्थित केला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, अरविंद दोरगे यांनी निषेध व्यक्त केला.
सरपंच संतोष देशमुख व विश्वजीत चव्हाण यांच्यावर झालेल्या भ्याड व निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज दिवसभर यवत ग्रामस्थांनी संपूर्ण गाव कडकडीत बंद पाळत निषेध व्यक्त केला.
मस्साजोग व यवत येथील झालेल्या घटना या दुर्दैवी असून पुणे ग्रामीण पोलीस दलाने विश्वजीत चव्हाण यांच्या खुनाचा तपास अत्यंत जलदगतीने करत 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या विरोधात असणारे सर्व पुरावे न्यायालयात सादर करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले. तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीतील परप्रांतीय कामगारांची माहिती कंपनी प्रशासनाने व उद्योजकांनी पोलीस स्टेशनला द्यावी असे आवाहन देखील देशमुख यांनी केले आहे.