नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच राजेंद्र मेहेर यांच्यावर १७ पैकी १३ सदस्यांनी अविश्वास ठराव जुन्नरचे तहसीलदार यांच्याकडे मंगळवारी (दि. ११) दाखल केला आहे. वारूळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून राजेंद्र तुकाराम मेहेर २०२१ पासून कार्यरत होते. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवून १३ सदस्यांनी सरपंच राजेंद्र मेहेर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. जुन्नर, तहसील कार्यालय येथे तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांच्या समोर १३ सदस्यांनी सह्या करून अविश्वास ठराव दाखल केला आहे.
यामध्ये ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ, उपसरपंच रेखा फुलसुंदर, मीना वारुळे, नारायण दुधाने, सोनल अडसरे, जंगल कोल्हे, प्रकाश भालेकर, संगीता काळे, स्नेहल कांकरिया, देवेंद्र बनकर, किरण आल्हाट, माया डोंगरे, राजश्री काळे यांनी अविश्वास ठरावावर सह्या केल्या आहेत. २० जानेवारी २०२१ रोजी वारूळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. गणपीर बाबा ग्रामविकास पॅनलचे १७ पैकी १० जागा व भागेश्वर ग्रामविकास पॅनलला ७जागा मिळाल्या होत्या, गणपीर बाबा ग्रामविकास पॅनलचे राजेंद्र मेहेर यांची सरपंचपदी वर्णी लागली होती.
काही दिवसांपासून सरपंच मेहेर हे सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन मनमानी कारभार करीत असल्याने सदस्यांमध्ये संघर्ष सुरू होता. अखेर गणपीर बाबा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख संजय वारूळे, जालिंदर कोल्हे आणि भागेश्वर ग्रामविकास पॅनल प्रमुख आशिष फुलसुंदर, देवेंद्र बनकर यांनी एकत्रित येवून सरपंच राजेंद्र मेहेर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. अविश्वास ठरावावर १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजात वारूळवाडी ग्रामपंचायत येथे मतदान होणार आहे.