यवत: यवत परिसरात सकाळपासूनच उन्हाचा लपंडाव सुरू होता, अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास परिसरात पावसाने हजेरी लावली. अंगाची लाही लाही होणाऱ्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या यवत परिसरातील नागरिकांना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुमारे दीड तासापेक्षा अधिक काळ पडलेल्या पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळाला.
एप्रिलच्या उत्तरार्धापासून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून तापमानाने चाळीशी गाठली होती. सोमवारी सकाळपासून वातावरणात फरक जाणवत होता. दुपारनंतर तर ऊन-सावलीचा खेळ सुरू झाला. सायंकाळी अचानक वारा व ढगाच्या गडगडासह पावसाच्या सरी कोसळल्या काही काळ रिमझिम वाटणाऱ्या पावसाने अचानक मुसळधारपणा धारण केला. अचानक आलेल्या पावसाने सायंकाळी कामावरून सुटलेल्या कामगारांचे व महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वरांची तारांबळ झाली.
केडगाव, भांडगाव, चौफुला, पाटस, वरवंड यासह आजुबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस आला की वीज पुरवठा बंद होणे ही नित्याची बाब असून यामुळे परिसरातील सर्वत्र अंधार पसरला होता.
ऐन उन्हाळ्यात पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला तरी या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.