उरुळी कांचन : बोगस मिरचीची रोपे देऊन शेतकरी असलेल्या माजी सरपंचाचीच फसवणूक झाल्याची घटना आष्टापूर (ता. हवेली) येथे घडली आहे. तर न्याय मिळावा म्हणून संबंधित शेतकऱ्याने याबाबतची तक्रार हवेली तालुका कृषी विभागाकडे केली होती. मात्र, तक्रार देऊन 17 दिवस उलटल्यानंतर देखील संबंधित विभागाने याकडे पाठ फिरवल्याने अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे कृषी विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नितीन अंकुश मेमाणे (रा.आष्टापूर, ता. हवेली जि. पुणे) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते एक प्रतिष्ठित शेतकरी असून त्यांनी आष्टापूरचे सरपंचपदही काही काळ भूषविले आहे. मेमाणे यांनी आष्टापूर फाटा येथील मोरया हायटेक नर्सरीमधून नेत्रा सिड्स या कंपनीची अनुष्का व्हरायटीच्या नावाची सुमारे 6700 मिरचीची रोपे शेतात लावण्यासाठी जानेवारी २०२५ ला विकत आणली होती. जमिनीची योग्य मशागत करुन शेणखत, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर इत्यादी सर्व खर्च करून अधुनिक पद्धतीने लागवड केली.
अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतल्यामुळे व खत, औषधे वेळेवर दिल्यामुळे मिरची पिकावर कुठल्याही प्रकारचा करपा किंवा बोकड्या हा रोग पडला नाही. मिरची पीक तोडणीला आल्यानंतर मेमाणे यांच्या लक्षात आले की, मिरची ही वेळेअगोदरच लाल होते. मिरचीची लांबी वाढत नाही किंवा जाड होत नाही. शेंड्याला फुल असतानाच देठाकडून मिरची लाल होत आहे.
त्यानंतर याबाबत मेमाणे यांनी मोरया हायटेक नर्सरीचे मालक दीपक डाके यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी नेत्रा कंपनीचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष प्लॉट वरती बोलावले. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिरची पिकाला सांगितलेली सर्व प्रकारची खते व औषधे सोडूनही पिकामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. सदर मिरचीचे बियाणे हे निष्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे पीक वेळे अगोदर पक्के होत आहे, असे सांगण्यात आले. याबाबत कृषी विभागाकडे रीतसर तक्रार करणार आहे, असे मेमाणे यांनी नर्सरी चालकाला सांगितले होते.
त्यानंतर नितीन मेमाणे यांनी तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांच्याकडे 16 एप्रिलला लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीला आज रोजी 17 दिवस उलटून देखील अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. कृषी विभागाने त्वरित पंचनामे करणे अपेक्षित होते. कारण त्यावेळी पिकाची प्रत्यक्ष परिस्थिती पाहता आली असती. आता मिरचीचे पिक पक्के होऊन झाडे सुकली आहेत. त्यामुळे आता अधिकारी येऊन पिकाची काय पाहणी करणार? या पाहणीमध्ये जो खरा प्रॉब्लेम होता, तो त्यांना आता दिसणार का? असा सवाल शेतकरी मेमाणे यांनी उपस्थित केला आहे.
हवेली तालुका कृषी विभागाचा वरातीमागून घोडे असाच प्रकार सध्या सुरु आहे. त्यामुळे कृषी विभागावर नेमका कसा आणि किती विश्वास ठेवायचा? हाच खरा प्रश्न उपस्थित झाला आहे. कृषी विभागाने जर यामध्ये लक्ष घातले नाही, तर येत्या दोन दिवसांत सर्व मीडियाला बोलावून संपूर्ण मिरची पिकाची तोडणी करणार आहे. ते तोडलेले पीक तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये टाकण्यात येईल.
नितीन मेमाणे (शेतकरी, आष्टापूर, ता. हवेली)शेतकरी नितीन मेमाणे यांना नेत्रा सिड्स या कंपनीची अनुष्का व्हरायटीच्या नावाची सुमारे 6700 मिरचीची रोपे विकली आहेत. कंपनीने दिलेल्याच रोपांची विक्री केली आहे. आतापर्यंत एवढी तक्रार वगळता कोणाचीही तक्रार आलेली नाही. संबंधित कंपनीचे अधिकारी दोनदा पिकांची पाहणी करून गेलेले आहेत. अजूनही कृषी अधिकारी आल्यानंतर ते येण्यास तयार आहेत. यामध्ये मी कोणतीही फसवणूक केलेली नाही.
दीपक डाके (मालक – मोरया हायटेक नर्सरी,आष्टापूर, ता. हवेली)आष्टापूर येथील शेतकऱ्याची तक्रार कृषी विभागाला प्राप्त झालेली आहे. एका कर्मचाऱ्याने जाऊन पाहणी केली आहे. शेतामध्ये मिरचीचे आंतरपीक घेतले असल्याचे समोर येत आहे. या पिकाची पाहणी करण्यासाठी विद्यापीठाचा शास्त्रज्ञ लागणार आहे. त्यांना बोलाविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कृषी विभाग हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. पुढील दोन -तीन दिवसांत पंचनामा करण्यात येईल.
-मारुती साळे (कृषी अधिकारी, हवेली तालुका)