दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. त्यातच आता पाकिस्तानकडून राजधानी दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने त्यांच्याकडील फतेह- 1 या अतिघातक क्षेपणास्त्राने दिल्लीवर हल्ला केला आहे. मात्र भारताकडील हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे हे मिसाईल हवेतच नष्ट केलं आहे.
फतेह-1 क्षेपणास्त्र म्हणजे काय?
पाकिस्तानचे फतेह-1 हे एक मार्गदर्शित बहु-प्रक्षेपण रॉकेट प्रणाली आहे. जी प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे 140 किलोमीटर आहे. फतेह-1 अनेक प्रकारचे वॉरहेड वाहून नेण्यास देखील सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र ट्रक-आधारित लाँचरमधून डागता येते
दरम्यान आज पहाटेपासून भारत- पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत.पाकिस्तानकडून भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. जम्मू एअर बेस, उधमपूर एअर बेस, पठाणकोट एअर बेस, श्रीनगर एअर बेस, बियास एअर बेसवर पाककडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भारतीय लष्करांकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ला करत लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानमधील रावळपिंडी शहर मध्यरात्री स्फोटांनी हादरल्याची माहिती समोर आली.
पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला होता आणि भारतीय लष्कराने याचाच बदला घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानमधील तीन महत्त्वाच्या एअरबेसला टार्गेट करत भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आला आहे. नूर खान, रफिक आणि मुरिद एअरबेस भारताकडून लक्ष्य करण्यात आलं आहे.
भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आतापर्यंत जे ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्यावेळी त्यांनी आपलं हवाई क्षेत्र खुलंच ठेवलं होतं.मात्र फतेह -1 च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून पाकिस्तानमधील चार विमानतळांवर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानकडून देशातली सारी विमानतळं बंद करण्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून पहाटे 3.15 वा.पासून हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे