नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षामध्ये भारताने पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करून मोठा धक्का दिला आहे. “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले होते. पाकिस्तानने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले होते, परंतु भारताने त्यांना यशस्वीरित्या रोखले होते. त्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत ब्राह्मोस, हॅमर आणि SCALP क्षेपणास्त्रांनी १० पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसानही केले आहे. बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे.
भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी स्वीकारली परंतु कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला युद्धाची कृती मानले जाणार आणि प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा भारताने दिला. भारताने दिलेल्या इशाऱ्यातून पाकिस्तानने आता दहशतवादी कारवाया बंद कराव्या असा उघड संदेश देण्यात आला आहे.