मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
ब्लॅकमेलिंगचाच प्रकार
विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली जी घटना आहे, आपण राजकारण करतो, पण कोणाला जीवनातून उठवायचं अशा हेतूने राजकारण करणे योग्य नाही. ती केस 2016 मध्ये रजिस्टर झाली असून 2019 मध्ये संपली, गोरे तेंव्हा भाजपमध्ये नव्हते. पण काही गोष्टी उकरुन काढल्या जात आहेत. मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो. एखादा व्यक्तीने घरच्यांचा समाजात अपमान व्हायला नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न केला असता. पण त्यांच्याकडे लाचेची मागणी केल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मागणी रेकॉर्ड झाल्यानंतर पोलीस विभागाची खात्री पटली आणि त्यानंतर सापळा रचला गेला. त्यानंतर पैसे घेताना आरोपीला पकडलं. हा एकप्रकारे ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.
सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातला…
या प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये एक ती महिला आहे. दुसरा तुषार खरात आणि तिसरा अनिल सुभेदार आहे. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला होता. याबाबत सगळे पुरावे हाती लागले आहेत. त्यांचे व्हाट्सअप वरचे संभाषण सापडले आहे. पण दुर्दैवाची बाब अशी की, या सगळ्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. हे मी पुराव्यानिशी सांगत आहे. या प्रकरणात प्रभाकरराव देशमुख हे थेट तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातला झालेले आहेत. मंत्री गोरे यांचे जे व्हिडिओ केले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले आहेत. याबाबत पूर्ण चौकशी होणार आहे. आपण राजकीय शत्रू नसून राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणं चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.