पुणे : पुणे -सातारा महामार्गावर मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी चालकाने चक्कर आल्याने बस थांबविली. आणि चालकाचा बसमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना वारवे (भोर) गावाच्या शिवारात बुधवारी (ता.३) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे सुदैवाने बसमधील २५ प्रवाशांचे जीव वाचले आहेत.
जालिंदर रंगराव पवार (रा. पळशी, ता. खटाव, जि सातारा) असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी वाहक संतोष गवळी यांनी राजगड पोलीस ठाण्यात नोटीस दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस म्हसवडकडे चालली होती. बस स्वारगेटला आगारात आल्यानंतर बसच्या चालक आणि वाहकांची बदली झाली. आणि चालक जालिंदर पवार आणि वाहक संतोष गवळी हे बस घेऊन म्हसवडकडे चालले होते.
पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका पार करून वरवे गावच्या हद्दीत आल्यानंतर एसटी बसचा वेग मंदावला. याबाबत वाहक संतोष गवळी यांनी बसचालक जालिंदर पवार यांना कारण विचारल्यावर त्यांनी चक्कर येत असल्याचडे सांगितले.
त्यानंतर जालिंदर पवार यांनी बस रस्त्याच्या कडेला थांबवली. वाहकाला पवार यांच्याशी पुन्हा बोलायचे होते. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर वाहकाने पवार यांना प्रवाशांच्या मदतीने नसरपूर येथील खासगी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी पवार यांना उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, बसमधील २५ प्रवाशांचे सुदैवाने जीव वाचले आहेत. तर बस चालक जालिंदर पवार यांच्या जाण्याने एसटी कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.