महेश सूर्यवंशी
शिरापूर : शिरापुर दौंड – दौंड-सिद्धटेक मुख्य रस्त्यावर शिरापूर हद्दीतील भीमा नदी पुलाजवळचं वळण सध्या वाहनचालकांसाठी जीवघेणं ठरत आहे. याठिकाणी सोमवारी (२१ एप्रिल) रात्री एका डंपरचा भीषण अपघात झाला असून, आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.तसेच वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या ठिकाणी सतत अपघात घडत असून, वळणाचा अंदाज न लागल्याने अनेक वाहनचालक ताबा गमावतात, परिणामी वाहने रस्त्याच्या बाहेर जातात किंवा पलटी होतात. या अपघातांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांच्याकडून वारंवार गतीरोधक बसविण्याची, वळणाजवळ सावधतेचे फलक लावण्याची तसेच अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
“या ठिकाणी लवकरात लवकर गतीरोधक, दिशा दर्शक फलक व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नाहीत, तर आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.
या रस्त्यावरील धोकादायक वळणाबाबत ग्रामपंचायतच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना कित्येक वेळा लेखी व तोंडी कल्पना देण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंपनीला देखील वारंवार पत्रव्यवहार व फोनद्वारे ही माहिती देण्यात आली. मात्र, अद्याप कुणीही याची दखल घेतलेली नाही. दोन निरपराध नागरिकांचा बळी गेल्यानंतरही जर याकडे दुर्लक्ष केलं जात असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता यावर कठोर उपाययोजना झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,असे स्पष्ट शब्दांत शिरापूरचे सरपंच. सुनंदा दादासाहेब फाळके यांनी सांगितले आहे