पुणे: अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 19 वर्षांच्या तरुणीच्या अपहरणानंतर तिच्यावर आळंदीत आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात महिला कीर्तनकारासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, सुनिता अभिमन्यू आंधळे, अभिमन्यू भगवान आंधळे आणि गाडीचा एक अज्ञात चालक यांच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार, जबरदस्ती आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 2 जून रोजी घडली होती. पीडित तरुणी घरी एकटी असताना महिला कीर्तनकार सुनिता आंधळे यांनी तिच्या घरी भेट दिली आणि शेतात फिरायला जाऊया, असे सांगून तिला बाहेर बोलावले. त्यानंतर तिला जबरदस्तीने एका काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीत (MH 43 CC 7812) बसवून आळंदीतील केळगाव रोडवरील एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले. तिथे तिला बंदिस्त ठेवण्यात आले आणि सतत लग्नासाठी दबाव आणत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
पीडितेच्या माहितीनुसार, अण्णासाहेब आंधळे याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यावेळी प्रवीण आंधळे, सुनिता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिच्यावर मानसिक दबाव टाकत लग्नासाठी धमकावले. विरोध केल्यास अॅसिड फेकण्याची धमकीही दिली गेली.
तथापि, पीडित तरुणीने मोठ्या धाडसाने 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत तरुणीची सुटका केली आणि आरोपींना अटक केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







