पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने महसूल विभागाने भोगवटा वर्ग 2 जमिनी तारण ठेवण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना विविध प्रकारची कर्ज घेणे सुलभ होणार आहे.शेतीसाठी आवश्यक भांडवल उभारणे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ जाणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला. भोगवटा वर्ग 2 आणि देवस्थान इनाम वर्ग 3 या प्रकारातील जमिनी तारण ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे बँका आणि वित्तीय संस्थांना स्पष्ट मार्गदर्शन मिळेल आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिपत्रक नव्याने जारी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, खासदार नितीन पाटील, तसेच विविध सरकारी आणि वित्तीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान या बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार भोगवटा वर्ग २ मधील जमिनी तारण ठेवणे आणि कर्ज थकित झाल्यास त्या विक्री करण्याची कायदेशीर तरतूद आहे. मात्र, बऱ्याच बँकांना या तरतुदींची संपूर्ण माहिती नाही, त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बँकांना यासंबंधी माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे