Pune News : मंचर, (पुणे) : आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा संशयित पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 08) सायंकाळी समोर आली आहे. शेतात कांदा काढणीचे काम करत असताना एका 33 वर्षीय महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Pune News
नकुशा बाळू सुपे (वय-33, रा. वाडा-सुपेवाडी, ता. खेड) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. त्या सध्या आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथे कांदा काढणीच्या कामासाठी आल्या होत्या. शुक्रवारी दुपारच्या सुमारास सूर्य ओकत असलेल्या कडक उन्हात त्या काम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या शेतातच कोसळल्या. Pune News

सोबत काम करणाऱ्या मजुरांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी दवाखान्यात नेले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. Pune News
मयत नकुशा सुपे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वाढत्या तापमानाची तीव्रता पाहता नागरिकांनी दुपारच्या वेळी कडक उन्हात काम टाळावे, सतत पाणी प्यावे आणि उष्माघाताची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शिवाजीराव जाधव यांनी केले आहे. Pune News





