सागर जगदाळे
भिगवण: आजच्या आधुनिक जगात प्रत्येक तरुणाईच्या हातात स्मार्टफोन आपणाला पाहायला मिळत आहे. स्मार्टफोन बनविण्या मागचा हेतू होता की प्रत्येकाला आपली कामे वेगाने आणि वेळ न घालवता करता यावी. या उद्देशाने त्याची निंर्मिती करण्यात आली. परंतु या स्मार्टफोनचा वापर आजची तरुणाई योग्य कामासाठी न करता भलत्याच कामांसाठी करीत आहे.
सध्याच्या घडीला स्मार्टफोन वर टीव्ही वर दिसणाऱ्या ऑनलाईन जुगाराच्या आकर्षित जाहिराती व या जाहिरातींमधून दाखविले जाणारे थोड्याच वेळात तुम्ही कसे लाखो रुपये जिंकू शकता याचे स्वप्न.या जाहिराती करणारे ही अगदी प्रसिद्ध असे कलाकार आहेत जे स्वतः हुन तरुणाला या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजची तरुणाईही या जाहिरातींना बळी पडून कर्जबाजारी,व्यसनाधीन व नैराश्याच्या गर्तेत ओढली गेलेली पाहायला मिळत आहे.
चौकाचौकात तरुणाईचे डाव रंगू लागले आहेत.रात्र-रात्रभर ही तरुण पिढी ऑनलाईन जुगाराचे रमिसारखे व तिनपानी गेम खेळत आहे.यातून लखपती होण्याच्या उमेदीवर रोजचे हजारो रुपये हरत असल्यामुळे तरुणाई कर्जबाजारी होऊन व्यसनाधीन बनत चालली आहे. तरुणांची झोपेची वेळ रात्री दोन किंवा तीन ची झाली असून सकाळी अकरा किंवा बारा वाजता ह्यांचा दिवस उजेडत आहे. काही तरुणांना तर निद्रानाश यासारखे आजार जडून नैराश्याच्या खाईत ते ओढले गेले आहेत.
भिगवणसारख्या शहरी भाग असो किंवा भिगवणच्या आसपास असणाऱ्या पंचक्रोशीतील गावात ऑनलाईन जुगार खेळण्याच्या प्रमाणात तरुणाईचे प्रमाण वाढत आहे. सद्यातरी या प्रकरणाबाबत कुठे उघड बोलले जात नसले तरी भविष्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई कर्जबाजारी झालेली प्रकरणे ऐकायला मिळतील.
आयुष्यात पैसा जरी महत्वाचा असला तरी तो कमविण्यासाठी शॉर्टकट मारून उपयोग होत नाही. त्यासाठी कष्टच करावे लागते. परंतु आजच्या तरुणाईची कष्ट न करता दे रे हरी खाटल्यावरी…..अशी गत झाली आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही याचा विसर बहुदा तरुणाईला पडलेला दिसत आहे.‛खेलो रम्मी और जितो करोडो’अशी जाहिरात करणारे नामवंत सिने कलाकार यांच्या जाहिरातींच्या आमिषाला बळी पडून तरुणाई एकदा पाहूया तरी ….घेऊया रिस्क….झालोच करोडपती तर….या आशेवर गेम डाउनलोड करतात आणि सुरुवातीला मिळणारा काही हजारो रुपयांचा बोनस कधी या मुलांना त्यात गुंतवून टाकतो हे कळतच नाही आणि नंतर कधी कर्जबाजारीपणाचा बोनस हा गेम देऊन गेला हे लक्षात पण येत नाही.
सुरुवातीला होणारा थोडा फायदा पाहून ही मुले आणखी जास्त रक्कम गुंतवण्यास सुरुवात करतो व जास्त रकमेच्या हव्यासापोटी सर्व रोखड गमावून बसतो.सर्व रोखड गमावल्यामुळे मंग सुरू होते उसनवारी,सावकाराकडून टक्क्यावर पैसे घेणे आणि कधी हा तरुण कर्जबाजरीच्या खाईत ढकलला हे कळायला मात्र उशीर होतो.तरुणांची अशी अवस्था होऊन आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था झाली आहे.त्यामुळे सर्वकाही गपचूप पणे सहन करण्याशिवाय तरूणाई पुढे दुसरा पर्याय राहिला नाही.