पुणे ता. 13 : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सुमारे दोनशेवर शिक्षक शिक्षणाचे मूळ काम सोडून केंद्रप्रमुखांची हुजरेगिरी करण्यात मग्न असून या प्रकारावर कारवाई करणारे प्राथमिक शिक्षणाधिकारीच ‘नॉट रिचेबल?’ मोडवर आहे. त्यामुळे एकूणच जिल्हा परिषदेतील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वच यंत्रणेने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यनगरीत शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्याचा प्रकार दिसून येत आहे.
परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत नव्वद टक्के हजेरीची अट शासनाने घातली आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडून वरील अट पुर्ण न झाल्यास त्याला परीक्षेला बसू दिले जात नाही. मात्र, हवेली, जुन्नर, आंबेगाव आणि शिरुरसह विविध तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या सेवेत असलेले दोनशेहून अधिक शिक्षक गेल्या पाच ते दहा वर्षांपासून अध्यापनासाठी वर्गात गेले नसले, तरी शिक्षकांचे अधिकारी म्हणून मिरवणाऱ्या केंद्रप्रमुखांची कामे मात्र चोखपणे करीत आहेत. दहापेक्षा अधिक शिक्षक, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयातील शिक्षण विभागात डेटा एंट्रीचे काम करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शिक्षणाधिकारी नॉट रिचेबल मोडवर
‘पुणे प्राईम न्यूज’ने हा प्रकार सुमारे १५ दिवसांपूर्वी उजेडात आणला होता. मात्र पंधरा दिवस होऊनही कुठलीही कारवाई संबंधित खात्याकडून झालेली नाही. दरम्यान या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकाडे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने मागील दोन दिवसांपासून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते फोनच उचलत नसल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांना लघुसंदेशाद्वारे कल्पना देऊनही त्यांनी प्रतिक्रिया देण्यात रस न घेतल्याने या प्रकाराला एकूणच वरिष्ठ पातळीवर पाठिंबा आहे किंवा कसे? असा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणी आता थेट शिक्षणमंत्र्यांनीच जातीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हवेली व जुन्नर तालुक्यात सर्वाधिक वीस केंद्रे असून, तालुक्यात वीस केंद्रप्रमुख काम करत आहेत. केंद्रप्रमुखांनी आपल्यावरील कामाचा बोजा कमी करण्यासाठी पंचवीसपेक्षा अधिक शिक्षक कामाला लावले आहेत. हे शिक्षक शिक्षकांची माहिती भरणे, शाळा व शिक्षकांकडून केंद्रप्रमुखांना लागणारी माहिती गोळा करणे, शिक्षकांना संगणकीय मदत करणे अशी कामे करत आहेत. या कामामुळे वरील शिक्षक त्यांच्या वर्गावर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
दरम्यान शिक्षक विद्यादानाचे आपले मुख्य काम सोडून केंद्र प्रमुखांची चाकरी करत असल्याची बाब शाळेतील उपशिक्षक, तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यापासून ते थेट जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनाही माहित आहे. मात्र, काळाची गरज म्हणून संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी वरील प्रकार सुरु राहू दिला असल्याची चर्चा शिक्षण खात्यामध्ये आहे. वरील शिक्षक त्यांचे नेमून दिलेले मुख्य काम करत नसल्याने, मागील दहा वर्षांच्या काळात हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर सुटले असल्याचे विदारक चित्र आहे. या प्रकरणाची शिक्षणमंत्री स्तरावरूनच सखोल चौकशी होऊन, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.
असरचा अहवाल आणि शिक्षकांची हुजरेगिरी
अलीकडेच प्रथम संस्थेने राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षणाची स्थिती या विषयावर असर अहवाल प्रसिद्ध केला. त्यात नमूद केल्याप्रमाणे इयत्ता तिसरीचे पाचवीचे ४९ टक्के विद्यार्थी वाचन करू शकत नाहीत. ५३.८ टक्के विद्यार्थी वजाबाकी करू शकत नाहीत. त्यात पुणे विभागातील सुमारे ३९ टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय शिक्षणासह व्यवस्थापनातील अनेक त्रुटी या अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. याचे कारण आहे शिक्षकांचे शाळेतच न जाणे. शिक्षक संबंधित शाळेत न गेल्याने विद्यार्थ्यांकडेही दुर्लक्ष होत असल्याने त्यांची शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे.
हवेली, जुन्नर, आंबेगाव, शिरुरसह जिल्हातील तेरा तालुक्यात जिल्हा परिषदेने शिक्षणाच्या सुसुत्रीकरणासाठी दोनशे पेक्षा अधिक केंद्रप्रमुखांची नेमणुक केली आहे. हवेली, जुन्नर व शिरुर या तीन बड्या तालुक्यात प्रत्येकी वीसहून अधिक केंद्रप्रुमख आहेत. तर उर्वरीत दहा तालुक्यात दहा ते वीसच्या दरम्यान केंद्रप्रमुखांची संख्या आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक, मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांच्यामधील दुवा म्हणून केंद्रप्रमुख काम करतात. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी करणे, शिक्षक शाळेत वेळेवर येतात का? ते वर्ग घेतात का? शाळांचा दर्जा याची तपासणी करण्यापासून, शाळांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परीषदेने केंद्रप्रमुखांची नेमणुक केलेली आहे. परंतु, याच दोनशेहून अधिक केंद्रप्रमुखांनी “आपल्या ” सोईसाठी, आपल्या केंद्रातील संगणकाचे ज्ञान असलेल्या एक-दोन शिक्षकांना हाताखाली नेमले आहे. त्यांच्याकडून विविध कामे करुन घेतली जात आहेत.