उरुळी कांचन, ता. 19 : नववीत शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा हात पकडत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन परिसरात मंगळवारी (ता. 18) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. मुलीच्या आईने आरोपींना जाब विचारला असता, मुलगी आमच्यासोबत बोलत नाही, असे म्हणत तिघांनी मुलगी व तिच्या आई-वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध पॉक्सोसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहील विलास चौधरी, अजिंक्य दिलीप सावंत (दोघेही रा. एम. जी. रोड, उरुळी कांचन) आणि अविनाश आनंद शिंदे (रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 16 वर्षीय पीडित मुलीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने तिला दूध आणण्यासाठी दुकानात जाण्यास सांगितले. मुलगी घराबाहेर जात असताना तिने आईला मोठ्याने आवाज दिला. त्यामुळे आई घराबाहेर आली असता, शिंदवणे येथील ऋतु फार्मच्या पाठीमागील कामठे मळा परिसरात मुलीजवळ तिघे तरुण मोटारसायकलसह उभे असल्याचे दिसले. त्यापैकी साहील चौधरी याने मुलीचा हात पकडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मुलीच्या आईने तिघांना, “तुम्ही माझ्या मुलीला का त्रास देता?” असा जाब विचारला. त्यावेळी तिघांनी मुलगी आमच्यासोबत बोलत नसल्याचे सांगत पीडित मुलगी, तिची आई आणि वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी साहील चौधरी याने वीट उचलून पीडितेच्या आईच्या उजव्या पायाच्या नडगीवर मारल्याचे तसेच पीडित मुलीच्या पोटात लाथ मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी साहील चौधरी, अविनाश शिंदे आणि अजिंक्य सावंत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर दखल घेत तिघांना अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तातडीने पोलिसांची पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी तत्काळ तिघांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत.







