बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यातील संघर्षाचा भाजपला मोठा फटका बसला आहे. या संघर्षामुळे आता आष्टी मतदारसंघातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी लांबल्याची चर्चा आहे. आजवर बीड जिल्ह्यातील भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचा शब्द अंतिम असायचा. परंतु प्रथमच आमदार सुरेश धस यांनी थेट त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आता पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील रखडल्या आहेत.
बीड जिल्ह्यात भाजपाचे 24 मंडळ अध्यक्ष जाहीर होणार आहेत. त्यापैकी 20 मंडळ अध्यक्षांची निवड जाहीर झाली आहे. आष्टी मतदारसंघात तांत्रिक अडचणींमुळे ही निवड अद्याप झाली नाही. लोकनेत्या पंकजा मुंडे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी लवकरच जाहीर होतील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले आहे.दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये मुंडे आणि धस यांच्यात कोण बाजी मारतो? यावरूनच पक्ष नेमका कोणाच्या पाठीशी आहे हे देखील स्पष्ट होऊ शकणार आहे.
मात्र सध्या पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील संघर्ष बीडसह राज्यातील राजकीय वर्तुळातही विशेष चर्चेत आहे.बीड जिल्ह्यात भाजपाच्या तालुकाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. नव्याने निवड झालेल्या या पदाधिकाऱ्यांचा सत्कार परळी येथे पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. परंतु मुंडे – धस याच्या संघर्षामुळे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती रखडल्या असल्याची माहिती समोर आली आहे.