उरुळी कांचन : येथील दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर आता ग्रामस्थांच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. वाढती लोकसंख्या, मोठी बाजारपेठ आणि रोजची प्रचंड वर्दळ यामुळे गावात कचऱ्याचे डोंगर साचत असून, प्रकल्पासाठी आवश्यक असलेली 3 एकर जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.

प्रशासन सहकार्यास तयार आहे, ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला आहे आणि ग्रामसभेनेही ठराव मंजूर केला आहे; मग तरीही देवस्थान ट्रस्ट जागा देण्याबाबत ठोस निर्णय का घेत नाही? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या उपलब्ध कागदपत्रांनुसार गावात दररोज सुमारे 7 ते 11 टन कचरा निर्माण होतो. सध्या उपलब्ध असलेल्या अपुऱ्या जागेत कचरा साठवला जात असला, तरी ही व्यवस्था भविष्यासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे.

या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी कायमस्वरूपी अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे अत्यंत अत्यावश्यक झाले आहे. उरुळी कांचनमध्ये हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी ‘ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन’ अत्यंत आग्रही असून सातत्याने पाठपुरावा करत आहे.

जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराच्या व्यासपीठावर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट शब्दांत ग्वाही दिली होती की, “केवळ जागेचा प्रश्न मार्गी लावा, प्रकल्पासाठी निधी आणि प्रशासकीय सहकार्य देण्यास जिल्हा परिषद पूर्णपणे तयार आहे.”
जिल्हा परिषद प्रशासन निधी व तांत्रिक सहकार्य देण्यास तयार आहे, ग्रामपंचायतीने सर्व कायदेशीर सोपस्कार आणि ग्रामसभेचा ठराव पूर्ण केला आहे, तरीही देवस्थान ट्रस्टकडून जागा देण्याबाबत अपेक्षित निर्णय अद्याप का प्रलंबित आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. देवस्थान हे गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी असते. कचऱ्याच्या समस्येने उरुळी कांचनचे आरोग्य धोक्यात आले असताना, देवस्थान ट्रस्टने 3 एकर जागा देण्यास उशीर का करावा? विश्वस्तांनी आता तरी भूमिका स्पष्ट करून उरुळी कांचनकरांना दिलासा द्यावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, एकीकडे गाव कचऱ्याच्या दुर्गंधीत आणि घाणीच्या साम्राज्यात सापडले असताना, दुसरीकडे जागेअभावी एवढा महत्त्वाचा प्रकल्प रखडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन जागेचा निर्णय घेऊन कचरा प्रकल्पाला मदत करावी अशी मागणी जोर धरू लगली आहे.
याबाबत देवस्थान ट्रस्टचे खजिनदार युवराज बाप्पू कांचन म्हणाले, “ग्रामसभेला मी स्वतः हजर राहिलो होतो . यावेळी ग्रामपंचायतीने पत्र दिले आहे. याबाबत लवकरच देवस्थान ट्रस्टची मिटिंग घेण्यात येणार असून या मिटिंगमध्ये चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल.”







