उरुळी कांचन , ता. ३० : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. हडपसर परिसरातील विषारी दारूमुळेच उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका तरुण रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दृष्टी अधू होणे, मळमळ, तोंडातून फेस येणे आणि प्रकृती झपाट्याने खालावणे अशी गंभीर लक्षणे दिसल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी (ता.२९) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे विषारी दारूमुळे मृतांचा आकडा आता २० वर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उमेश अवचर (वय ३२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो उरुळी कांचन परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी उमेशने स्थानिक दारू गुत्त्यावरून दारूचे सेवन केले होते. त्यानंतर अचानक त्याला मळमळ, डोळ्यांसमोर अंधारी येणे आणि दृष्टी धूसर होण्याचा त्रास सुरू झाला. काही वेळातच त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि प्रकृती गंभीर बनली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने उरुळी कांचनमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांच्या तपासात ज्या अवैध दारू निर्मिती साखळीचा उलगडा झाला आहे, त्याच नेटवर्कशी संबंधित भागातील दारू अड्ड्यावरून उमेशने दारू घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विषारी दारूचे लोण केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडपुरते मर्यादित नसून आता उरुळी कांचनसारख्या ग्रामीण भागातही पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, या दारूकांडामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काहींनी घरातील कमावते सदस्य गमावले आहेत, तर अनेकजण अजूनही विविध रुग्णालयांमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. या पार्श्वभूमीवर अवैध हातभट्टी आणि विषारी दारूच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उमेश अवचरच्या मृत्यूनंतर आता ग्रामीण भागातही विषारी दारूच्या विळख्याची भीती वाढली असून, अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्या टोळ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना कोणतीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. “विषारी दारू तयार करणाऱ्या आणि तिचा पुरवठा करणाऱ्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्यात येत असून आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून हा प्रकार म्हणजे एक प्रकारे हत्या आहे. या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई केली जाईल,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.







