मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटातील हमजा अली मजारीच्या भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंहवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मल्टीस्टारर ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवत 1,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, या चित्रपटाने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. मात्र, या अभूतपूर्व यशानंतरही रणवीर सिंहला मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंह आणि ‘डॉन 3’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यातील वादामुळे अभिनेत्याला कोट्यवधींचा फटका बसण्याची शक्यता आहे. रणवीरने हा चित्रपट अचानक सोडल्याने प्रॉडक्शन कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘व्हरायटी इंडिया’च्या अहवालानुसार, एक्सेल एंटरटेन्मेंटने रणवीर सिंहकडे थेट 40 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. रणवीरने चित्रपटातून माघार घेतल्यामुळे आर्थिक गुंतवणूक, शूटिंग शेड्युल, नियोजन आणि आधीच करण्यात आलेल्या कमिटमेंट्सवर परिणाम झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर प्रॉडक्शन हाऊसने काही विभाग बंद केले असून, काही विभागप्रमुखांना अन्य प्रकल्प शोधण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, रणवीर सिंहने या आरोपांना नकार दिला आहे. एक्सेल एंटरटेन्मेंटला कोणतीही नुकसानभरपाई देण्याची आपली जबाबदारी नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. याआधीही आपण कोणत्याही आर्थिक दाव्यांशिवाय प्रकल्पातून बाहेर पडलो असल्याचे सांगत, या वादाला अनावश्यक वळण देऊ नये, अशी भूमिका रणवीरने घेतली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीरला ‘डॉन 3’ची पटकथा अपेक्षेप्रमाणे वाटली नव्हती. त्याने पटकथेत अनेक बदल सुचवले होते, मात्र अंतिम मसुद्यावर समाधान न झाल्यामुळेच त्याने प्रकल्प सोडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. दुसरीकडे, एक्सेल एंटरटेन्मेंटने दावा केला आहे की रणवीरच्या माघारीपर्यंत चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू झाले होते.
या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रणवीर सिंह आणि प्रॉडक्शन हाऊसच्या प्रतिनिधींमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही.
दरम्यान, रणवीर सिंह लवकरच ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, पहिल्या भागासाठी रणवीरने सुमारे 30 ते 40 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे समजते.







