संतोष पवार
पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार असून, या पुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवार सायंकाळपर्यंत २ लाख ५२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येतो. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते.