रायगड : रायगडच्या रोहा तांबडी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. ही घटना 26 जुलै 2020 रोजी घडली होती. या प्रकरणातील सर्व सात आरोपींची 8 मे 2025 रोजी माणगाव सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे . हा निकाल आरोपीच्यां बाजूने लागल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचबरोबर या निर्णयामुळे पिडीतेच्या कुटुंबावर अन्याय झाला आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पेणमधील नवख्या वकिलांनी प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहा तालुक्यातील तांबडी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि क्रूर खूनाच्या प्रकरणाने रायगडसह महाराष्ट्र संतापाची लाट उसळली होती. प्रकरण घडल्यानंतर रोहा पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 24 तासात त्यांना अटक केली होती. शासनाने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी माणगाव सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, खरे मुख्य आरोपी लपवून आदिवासी तरुणांना पुढे करण्यात आले आणि श्रीमंत, प्रभावशाली आरोपीला पोलिस व राजकीय पाठबळाने वाचवण्यात आले, असा गंभीर संशय सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.याप्रकरणी रोहा पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट इतकी कमकुवत होती की, ती न्यायालयात टिकलीच नाही. पुराव्यांची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब आणि डीएनए चाचण्या यात गंभीर त्रुटी आढळल्या. पोलिसांनी सात आदिवासी तरुणांना ताब्यात घेतले, पण ठोस पुरावे गोळा करण्यात पूर्णपणे अपयश आले.
या अत्याचार प्रकरणी आरोपींच्या बाजूने निकाल लागल्यानंतर पोलिसांनी तपास ढिसाळ ठेवल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
तसेच तत्कालीन पोलिस अधीक्षक आणि रोहा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील तपासावर संगनमताचे गंभीर आरोप होत आहेत. खरा आरोपी लपवण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक पुरावे नष्ट केले का? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान न्यायालयीन सुनावणीवर मंत्री अदिती तटकरे यांनी नाराजी जाहीर केली आहे. लवकरच उच्च न्यायालयात अपील दाखल करून पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असं तटकरे यांनी म्हटलं आहे.