सागर जगदाळे
भिगवण: दौंड तालुक्यातील राजेगाव गावात मागील आठवड्यात शाळकरी मुलीला खाऊचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. त्याची चर्चा राजेगावसह आसपासच्या गावामध्ये जोरदार झाली होती. परंतु, लहान शाळकरी मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांनी परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. शाळेत किंवा शिकवणीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक अधिकच काळजी घेऊ लागले आहेत.
तक्रारवाडीत काल सोमवारी (दि.०३) घडलेल्या घटनेतही अनोळखी व्यक्ती चॉकलेट देऊन बोलावत असल्याने घाबरलेल्या पाच-सहा वर्षाच्या मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितल्याने घरचे सर्वजण काहीवेळ खूप घाबरलेले होते. याप्रसंगाबाबत मुलीच्या पालकांनी घडलेला प्रकार कथन करताना सांगितले की, तक्रारवाडी (ता.इंदापूर) अंगणवाडीतील आमची मुलगी शाळेतुन घरी येताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी तिला चॉकलेटचे आमिष दाखवीत गाडीवर बस म्हणाले.
पण लहान मुलगी त्या अनोळखी व्यक्तींना ओळखत नसल्यामुळे ती घाबरून घरी पळत गेली. ती खूप घाबरलेली होती. सदर प्रकार लगेच गावचे पोलीस पाटील अमर धुमाळ यांच्या कानावर घातला असता, त्यांनी भिगवण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. काही मिनिटांतच पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील हे आपला पोलिसांचा ताफा घेऊन मुलीच्या घरी पोहचले व घडलेल्या घटनेचा आढावा घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरविली. परंतु कोणतीही प्रकारची संशयित व्यक्ती आढळून आली नाही.
भिगवण व भिगवण परिसरात मुले पळविणारी टोळी आल्याच्या उडणाऱ्या अफवा या पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे. अशा प्रकारांना प्रामुख्याने समाज माध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी मिळत असल्याने ‘पराचा कावळा’ होत आहे. पोलिस यंत्रणेसाठी ही डोकेदुखी ठरत आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना विचारले आहे.
याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले, ‘मी आपल्या माध्यमातून अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे अवाहन करतो. अनेक शहाणी माणसेही अशा फुटकळ अफवांवर विश्वास ठेवताना दिसतात. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. ज्या अफवांना घाबरून लोकांनी पोलिसांशी संपर्क केला, त्याचीही आम्ही शहनिशा करत आहोत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळातच पोलीस पथक पाठवून खात्री केली असता, अद्याप तरी असा प्रकार घडला नाही. याबाबत पाहणारे अथवा तांत्रिक गोष्टी वरून समजून येत नाही. अलीकडे अशा अफवा पसरत आहेत. कोणीही अशा अफवावर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी असा प्रकार आढळला तर डायल 112 वर तात्काळ कॉल करावा. व घटनेची माहिती द्यावी. सर्व शाळा कॉलेज परिसरात बीट मार्शल, निर्भया पथक, ट्रॅफिक स्टाफ… पेट्रोलिंग नेमली आहे. त्यामुळे भिगवणकारांनी उडणाऱ्या अफवांना घाबरू नये. असे आवाहन ही केले.