Maharashtra Weather: राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून हवामान स्थिर असले तरी, येत्या 2 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान हवामानात बदल होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, तो दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह होईल.

विशेषतः विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर अधिक राहील, असे निरीक्षण आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके वाऱ्यापासून आणि पावसापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान पुन्हा स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि 8ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सूनचा हळूहळू निरोप सुरू होईल. त्यानंतर काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परतीचा प्रवास पूर्ण करेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.







