पुणे: महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज कमाल तापमान 29°C आणि किमान तापमान 27°C राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रता 82% अपेक्षित असून, 31 किमी/तास वेगाने नैऋत्येकडून वारे वाहतील. तळ कोकणासह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, याचा अर्थ या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्गसाठी ‘यलो अलर्ट’ आहे.

पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यालाही पुढील दोन दिवस येलो अलर्ट असून, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुणेगाव धरण 75% भरले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, वादळी वाऱ्यासह 30 ते 40 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदियालाही ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
एकूणच, महाराष्ट्रभर पावसाचा जोर कायम राहणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. रेल्वे वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज घेऊन निघावे.







