विशाल शिंदे
Bhor News नसरापूर, ता. 28 : भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे पुणे–सातारा सहापदरीकरण महामार्गालगत उभारलेल्या अतिक्रमणांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी (ता. 27) धडक कारवाई करत सेवा रस्त्यालगतची अनेक बांधकामे जमीनदोस्त केली. मात्र या कारवाईनंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला असून, नुकसानभरपाई व कायदेशीर प्रक्रियेवरून वाद चिघळला आहे. Bhor News

कापूरहोळ गावातील नारायणपूरकडे जाणाऱ्या चौकाजवळ सेवा रस्त्यालगत हॉटेल, दुकाने व विविध व्यावसायिक आस्थापनांनी अतिक्रमण केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणासाठी संपादित केलेल्या जागेवर ही बांधकामे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधितांना यापूर्वी अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला. Bhor News
सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजता पोकलेन, दोन जेसीबी, क्रेन, गॅस कटर, हायवा डंपर आणि सुमारे 25 पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायणपूर रस्त्यालगतच्या हॉटेल्स व शेड्सवर कारवाई करण्यात आली असून, महामार्गाच्या मध्यापासून 30 मीटरपर्यंतच्या अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यात आला. Bhor News
दरम्यान, या कारवाईला काही ठिकाणी स्थानिकांकडून तीव्र विरोध झाला. कापूरहोळ येथील मधुकर उकिरडे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मालमत्तेवर झालेल्या कारवाईविरोधात आक्षेप नोंदवत, योग्य नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय कारवाई मान्य नसल्याची भूमिका घेतली. 1981 च्या संपादन प्रक्रियेनुसार अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा त्यांचा दावा आहे. Bhor News
या पार्श्वभूमीवर वनश्री सोमनाथ उकिरडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मौजे कापूरहोळ येथील गट क्रमांक 7/3 मधील वडिलोपार्जित मालमत्तेचे कोणतीही पूर्वसूचना न देता नुकसान करण्यात आले. 27 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 4.30 वाजता यंत्रसामग्रीसह आलेल्या पथकाने कारवाई करत अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, यापूर्वी अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करूनही जमीन अधिग्रहण, संयुक्त मोजणी अहवाल किंवा नुकसानभरपाईबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. घटनेच्या वेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. Bhor News
दरम्यान, ही कारवाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुभाष घंटे, लक्ष्मण पाटील, पीएस टोल रोडचे अभिजित गायकवाड तसेच पोलीस अधिकारी तुकाराम राठोड यांच्या उपस्थितीत पार पडली. या घटनेमुळे कापूरहोळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Bhor News





