उरुळी कांचन, (पुणे) : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 745 ग्रामपंचायतीच्या “निवडणुका कधी होणार?” याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाही, पण “आम्ही तर आत्तापासूनच लढणार!” असा पवित्रा घेत पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील तरुण इच्छुकांनी घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्यांचे आरक्षण जाहीर झाल्यापासून शांत बसलेली तरुणाई आता थेट सोशल मीडियाच्या रणांगणात उतरली आहे. अद्याप निवडणुकीचे अधिकृत बिगुल वाजले नसले, तरी ‘भावी’ नेत्यांनी डिजिटल कट्ट्यावर प्रचाराचा कडक धुराळा उडवून देण्यास सुरुवात केली आहे.

सध्या उरुळी कांचनसह परिसरातील तरुणांच्या व्हॉट्सॲप स्टेटस, इन्स्टाग्राम रिल्स आणि फेसबुक पोस्टवर नजर टाकल्यास राजकीय वातावरण किती कडक आहे, याची प्रचिती येते. दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय याच्या चित्रपटातील गाजलेला डायलॉग “लायन आल्वेज लायन…” आणि “कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास!” अशा थेट आव्हानात्मक भाषेचा वापर करून विरोधकांना आत्तापासूनच ललकारले जात आहे. “आता थांबायचं नाही, थेट लढायचंच!” “भावी अनेक, प्रभावी एकच!” अशा वजनदार टॅगलाईन्स वापरून स्वतःची क्रेझ निर्माण करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे.

निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही, तरीही ग्राउंड लेव्हलवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गावागावांतील चौकांमध्ये आणि कट्ट्यांवर आतापासूनच प्रभागांची पुनर्रचना, त्या-त्या प्रभागांतील प्रलंबित समस्या, गावातील रस्ते, पाणी, वीज यावर खल सुरू झाला आहे. इतकेच नव्हे, तर ‘नवीन मतदार यादी’मध्ये कोणाची नावे आली आणि कोणाची वजा झाली, आपल्या हक्काची मते किती आणि विरोधकांची गळती कशी करायची, याची गणितीय बेरीज-वजाबाकी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सुरुवात केली आहे.
आरक्षण जाहीर झाल्यामुळे कही ख़ुशी कही गम अशी परिस्थिती आहे. याच संधीचा फायदा उठवत गावातील तरुणांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी शड्डू ठोकला आहे. आरक्षणाची लॉटरी लागल्यापासून तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
दरम्यान, आगामी ग्रामपंचायत निवडणूक ही केवळ पारंपरिक पद्धतीने न लढता, ती संपूर्ण डिजिटल आणि हायटेक होणार असल्याचे सध्याच्या सोशल मीडियाच्या ट्रेंडवरून स्पष्ट दिसत आहे. आता या सोशल मीडियावरील डरकाळी प्रत्यक्ष मतपेटीत किती मते खेचून आणणार, हे पाहणे येणाऱ्या काळात रंजक ठरणार आहे.







