पुणे: भारतीय रेल्वे लवकरच प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार असून, त्यासाठी एक भव्य योजना आखली आहे. संपूर्ण देशात ७ महत्त्वाचे हाय-स्पीड रेल्वे मार्ग तयार करण्याचे रेल्वे मंत्रालयाने ठरवले आहे या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवासाचा वेळ प्रचंड प्रमाणात वाचणार आहे. सध्या मुंबई ते पुणे प्रवासासाठी ‘डेक्कन क्वीन’ने ३.५ तास लागतात, पण हाय-स्पीड रेल्वेमुळे हे अंतर केवळ ४८ मिनिटांत पार करता येईल.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. सुरुवातीला ही सेवा सुरत ते बिलिमोरा या मार्गावर सुरू केली जाणार आहे. यामुळे केवळ पश्चिमच नव्हे, तर दक्षिण, उत्तर आणि पूर्व भारतालाही वेगवान प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हाय-स्पीड रेल्वेसाठी १६ लाख कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर भारतीय दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती येईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, यात दिल्ली-वाराणसी, वाराणसी-सिलिगुरी, मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद असे मुख्य मार्ग असतील. यामुळे दिल्ली ते सिलिगुरी दरम्यानचा प्रवास फक्त ६ तासांत पूर्ण होईल. हे जाळे अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडेल.
भारताची स्वतःची स्वदेशी बनावटीची पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ मध्ये प्रवाशांसाठी धावणार आहे. या प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल.







