Saarthi Scholarship : राज्य सरकारने सारथी संस्थेद्वारे (Saarthi Scholarship) मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार असून, यात एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील १७ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या निर्णयाचा अखिल भारतीय मराठा महासंघाने तीव्र विरोध केला आहे.

या संदर्भात मराठा महासंघाने सरकारला १५ दिवसांची मुदत दिली असून, शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने सकारात्मक कार्यवाही केली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सारथी संस्थेतर्फे आठवीमध्ये NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. त्यांना दर महिन्याला ९०० रुपये, जे चार वर्षांसाठी दिले जात होते. ज्या मराठा कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, ही शिष्यवृत्ती आता अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही विपरीत परिणाम होईल, असे अखिल भारतीय मराठा महासंघाने म्हटले आहे. सरकारने या एकतर्फी निर्णयामागचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.







